सोडला गाव मी

राख करुनी मला, सोडला गाव मी ,
माफ करुनी तुला,
मोडला डाव मी !!

चुकले माझे प्रेमाचे मार्ग ते जूने ,
ज्ञात असुनी मला, घेतला ठाव मी!!

खेळ खळतो शब्दांचे, आज मी जरी,
शब्द होता तुझा, सोसला घाव मी !!

व्यक्त होता तुझी, प्रीत ती वेगळी
मोल नव्हते मला, जाणला भाव मी !!

पुसुनी अश्रु आता, तोडतो नाळ ती,
गाव आता नवे, मांडला डाव मी!!

उपक्रमाचा दिवाळीअंक

बरेच दिवस वाट पहात असलेला उपक्रमाचा दिवाळी अंक आला आहे. हा पहा.

बरेच दिचसांनी

आज बर्‍याच दिवसांनी अनुदिनी पाहणे झाले :) . कामाचा आवाका आणि मराठी संकेतस्थळांवरचे अतिरेक यामुळे लेखन थोडे कमीच झाले आहे. बघु नवे काही लिहायला जमते का?
अरे हो, उपक्रम संकेतस्थळाला शासनाचा पुरस्कार मिळाला हे अनेकांना माहित असेलच.

सहकारी गृहसंस्था

महाराष्ट्रात नगरात/महानगरात राहणारे जवळपास सर्व नागरीक कोणत्या ना कोणत्या सहकारी गृहसंस्थांचे सभासद असतात. गंमत म्हणून महाजालावार माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर फारशी काही माहिती हाती आली नाही.

मला काय हवे आहे?

  1. सहकारी गृहसंस्थांमध्ये समिती कशी ठरवतात?
  2. समितीमधे कोण कोणती पदे असतात? त्यांच्या भुमिका काय असतात?
  3. या समित्यांना काय बंधने असतात?
  4. संस्थांचे व्यवस्थापन करण्याचे महत्वाचे नियम कोणते?

या बद्दल कोणाला माहिती असल्यास येथे द्यावी हि नम्र विनंती.



राजकिय विचार – विकृती की आपली आवड?

नमस्कार मंडळी,

हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात? या चर्चेमध्ये बरेच प्रतिसाद आले. वाद प्रतिवाद झाले. मुळात आवड-निवड सापेक्ष असल्याने या आणि अशा विषयांना अंत नाही. या चर्चांच्या निमित्ताने एक विषय मात्र डोक्यात आला. तो म्हणजे, राजकिय नेते हे समाजतल्या मानसिकतेचे चेहरे असतात. कोणाला कोणता नेता आणि विचार आवडावेत अथवा आवडू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अनेक वैयक्तिक एकत्र येऊन समाज बनतो आणि विचारधारांचा अभ्यास होण्या ऐवजी दुसर्‍याचे उणेपण दाखवणे जास्त होते. राजकारणावर चर्चा करणे ठिक आहे. पण आपल्याला खरच या राजकिय नेत्यांसारखे बनणे जमणार आहे का? हा एक विचार आहे. कोणामध्ये इतकी हिंमत आहे की जाऊन आजचे राजकिय वैचारिक चित्र बदलता येणार आहे? कोण हरीचा लाल आहे जो म्हणतो आज भारतात सर्व छान चालले आहे अथवा सुरळीत चालले आहे?

घरापासून ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या निवडी पर्यंत जो विरोध असतो तोचमुळी वैचारिक असतो. खास करून राष्ट्राचा जेंव्हा विचार असतो तेंव्हा राष्ट्राचे हित, विकास हेच सर्वांचे ध्येय असते. पण विचार प्रवाह मात्र वेगळे असतात. कोणाला कोणत्या विचार प्रवाहात सामील व्हायचे आहे तो वैयक्तिक विचारांचा भाग आहे. त्यासाठी आपण आपल्या विचारांचे समर्थन करणे योग्य. दुसर्‍याचे मुद्दे चुकीचेच आहेत असे मोठ्याने ओरडून आपले मुद्देच बरोबर आहेत असे नक्कीच सिद्ध होत नाही.

वर म्हटल्या प्रमाणे हे असे विषय अंतहिन आहेत. त्यापेक्षा या राजकिय नेत्यांच्या यशापयशाचा विचार केल्यास आपल्याला अनेक नवे अथवा अभ्यासपूर्ण मुद्दे मिळतील. खाली एक छोटी यादी देतो आहे. त्यातले काही नेते अलिकडचे आहेत. पण त्यांच्या राजकिय विचारांचा प्रभाव बराच परिणाम कारक आहेत. एखाद्या नेत्या बद्दल लिहिताना आपण थोडा अभ्यास करू आणि मगच लिहू. उगाच वैयक्तिक आकसापोटी नको.

  1. गांधीजी – जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे? येथे गांधीजी कसे महान होते अथवा नव्हते हा मुद्दा अपेक्षीत नाहीये. पण त्यांची हत्या/वध झाली/झाला हे सत्य आहे. आज सुद्धा त्यांच्या आडनावाचा करिश्मा आहे हे सुद्धा सत्य आहे.
  2. सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?
  3. हिटलर – चर्चिल – हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण? फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?
  4. नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत? पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?
  5. लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

राजकिय नेत्यांची बाजू घेताना आपल्याला खरच त्यांची सर्व मते पटली आहेत का? हे कितपत महत्वाचे आहे? एखादी व्यक्ति मग ती राजकिय असली तरी त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडायला हवे आहेत का? की त्यांच्यामधले आपल्याला आवडणारे/पटणारे मुद्दे/गुण आपण घ्यावेत आणि बाकिच्यांबद्दल वाद न घालता आपण त्यांच्या विचारांना सुद्धा मान द्यावा? तुम्हाला काय वाटते?

मंदी आणि व्यवसायातला नवा अध्याय

सध्या पहावे तिकडे मंदीचा परिणाम दिसतो आहे. भारतातले तज्ञ म्हणतात कि भारताला म्हणावी तेवढी झळ बसली नाही अथवा बसणार देखील नाही. एकिकडे मंदी तर एकिकडे महागाई असा विचित्र प्रकार दिसतो आहे. म्हणजे मागणी आहे पण पुरवठा नाही की, मागणी सुद्धा नाही आणि शक्य तेवढा पुरवठा सुद्धा नाही? सगळेच विचित्र आहे. मंदीचा खरा परिणाम पाश्चिमात्य देशांमध्ये आहे. कळत नकळत पाश्चिमात्य देशांशी संबंधीत भारतातल्या व्यावसायिकांना त्याची झळ बसते आहे. निर्यात क्षेत्रामध्ये असलेल्या सर्वांना झळ बसलेली आहे. पण सर्वात ग्लॅमरस झळ आहे ती माहिती तंत्रज्ञान उद्योगाला. आता जरा तिकडेच पाहू.

माहिती – तंत्रज्ञान क्षेत्राने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. या क्षेत्रातल्या कंपन्यांना मिळणारा डॉलर आणि युरोमधला पैसा आणि भारतीय चलनामधली तफावत हा खरा या धंद्याचा खरा आधार. डॉलरला घरचा आहेर मिळाल्याने आणि ओबामाच्या सरकाराने डॉलरचा बाहेर जाण्याचा ओघ काहीसा मंदावला खरा. पण मुळातच तो इकडे येत कसा होता हे जाणून घेणे सुद्धा गरजेचे वाटते. भारतीय तंत्रज्ञ खरच बुद्धीमान आहेत हे जगजाहीर आहे. पण याच सोबत भारतीय गुलामगिरी करण्यात सुद्धा अव्वल आहेत हे ही भारतीयांना माहित असुन नसलेले सत्य आहे. बरं, त्याचा इथे काय संबंध? सांगतो. मुळातच आमच्या सारखे अनेक भारतीय आपल्या सेवा काही भारतीय आणि अभारतीय कंपन्यांना विकतात. थोडक्यात आपला मेंदू भाड्याने देतात. जे काही बनवतात ते त्यांच्यासाठीच. आता या पैकी आमच्या भारतीय कंपन्यांनी पैसा बनवला. पण तो कसा? तर जास्तीत जास्त मेंदू कमी भाड्याने घ्यायचे आणि ते जास्त भाड्याने अभारतीय कंपन्यांना द्यायचे. मधला लगदा ह्यांचा. आणि त्यात जो कोणी सर्वोत्तम मेंदू कमीत कमी भाड्याने स्वतः जवळ राखून ठेवेल तो जिंकणार.

या सगळ्या प्रकारात आम्ही मध्यमवर्गीय भारतीय उगाच स्वतःला श्रींमत असल्याची जाणीव करुन देऊ लागलो. ज्याने कधी १५००० ची स्वप्ने पाहिली होती त्याला आता अचानक ३५००० सहजच मिळू लागले. मग काय करा जोरदार काम आणि मिळवा ३५००० चे ५००००. या गणितामध्ये गणिताची पाटी आपली नाही की गणिते सुद्धा आपली नाहीत याची जाणिवच नाही. आज सगळ्यांच त्याचा काही प्रमाणात दणका बसला आहे. आता एक सत्य मान्य करु की आम्हाला गुलामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. तसेच या गुलामगिरीमधुन मुक्त करण्याचा कोणताही मार्ग अथवा नेता आमच्याकडे नाही. पण मग आपण काय करायचे? हा मधला मलिदा कमी करता येऊ शकतो? हो. नक्कीच. आपण थोडेसे धाडस करु शकतो. असे ही आज टांगती तलवार आहेच. मग ज्या सेवा आपण नोकरी म्हणून विकतो, त्याच बाजारात जाऊन विकायचा प्रयत्न केला तर? काही समविचारींना एकत्र आणून छोटे छोटे व्यावसायिक समूह बनवून आम्हीच धंदा सुरु केला तर? शेवटी आजचे मोठे उद्योग सुद्धा काही प्रमाणात असेच पुढे आले आहेत ना?

थोडक्यात सांगायचे झाले तर आता नव्याने छोटे छोटे उद्योग समूह तयार करुन, आपल्या गरजा कमी करुन आणि जास्त फायद्याचे प्रलोभन टाळून आपण एक उद्योगपती बनले तर? मला विश्वास आहे की आम्हा भारतीयांमध्ये हि कुवत नक्कीच आहे. थोडा कमी फायदा मिळवा, आपल्यासाठी, आपल्या गरजा ओळखून, उत्पादने बनवून भारतीय पैसा येथेच खेळवा आणि अनेक खारी एकत्र येऊन प्रत्येक डॉलर आणि युरो इकडे आणल्यास जगातले समाधानी आणि म्हणून सुखी कदाचित फक्त आम्हीच असू.  चला तर मग, या मंदीच्या काळात व्यवसायातला हा नवा अध्याय लिहूया.

आयकर परतावा

मंडळी, 31 जुलै शेवटची तारीख आहे आयकर परतावा अर्ज भरण्याची. मला ना ही जबरा कटकट वाटते. साले पगारातुन न चुकता कर कापुन घेतात. सगळे उत्पन्नाचे स्त्रोत यांना माहित आहेत. तरीपण जादा कर कापला तर आम्हीच अर्ज करुन मागुन घ्यायचा. तुम्हाला काय वाटत? तुम्ही जर भारता बाहेर काम करत असाल तर त्या त्या देशामधला या बाबतीतला कायदा काय आहे?

पुनरागमन

नमस्कार मंडळी,

गेल्या सहा-सात महिन्यात या अनुदिनीवर काहीच नाही लिहिले. खरतर न लिहिण्यामागे असे काही खास कारण नव्हते. पण लेखन झाले नाही. तसा मी काही लेखक वगैरे नक्कीच नाही. पण अनुदिनीवर लेखन करणे तसा आनंद दायक अनुभव आहे. तो आनंद मला परत मिळवायचा आहे आणि म्हणुनच माझ्याच अनुदिनीवर मी पुनरागमन करतो आहे. डोक्यात विषय अनेक असतात पण लेखन केले जातेच असे नाही. बघु कसं जमतय ते.

सामाजिक जबाबदारी – प्रसिद्धी माध्यमे आणि आपण

उपक्रम या संकेतस्थळावर मी हि चर्चा सुरु केली होती. संपुर्ण चर्चा आणि उपक्रमींचे प्रतिसाद येथे पाहता येतील. आपण आपली मते येथे सुद्धा व्यक्त करु शकता…

बाँब स्फोट, गोळीबार, हल्ला हे हल्लीचे सर्वात जास्त वाचले जाणारे, ऐकले जाणारे शब्द आहेत. वाचेल् जातात वृत्तपत्रात, महाजालावर आणि ऐकले जातात दृकश्राव्य माध्यमांवर. जे वाचले जाते आणि पाहिले जाते त्याने समाज मनावर खुप खोलवर परिणाम होतात. ब्रेकिंग न्युज देणे हे आद्य कर्तव्य असणार्‍या प्रत्रकाराला/वार्ताहाराला आपण आपले कर्तव्य चोख पार पाडतो आहोत असेच वाटणे सहाजिक आहे. पण ते करत असताना आपण नक्की काय करतो आहोत. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला जातो?
तंत्रज्ञानच्या सोबतीने आज अनेक वृत्त वाहिन्या आहेत. वाहिनीचा कॅमेरामन नसेल तर मोबाईलवर ऑखोदेखा हाल देणे सुरु असतेच. एखादी बातमी घातक प्रतिक्रियांची साखळी बनवू शकते हे त्यांना कळत नाही का? हल्ली हेच विचार प्रत्येकाच्या मनात असतील. जे घडते आहे ते पहायला मिळत असल्याने या वाहिन्या पाहण्याचा मोह सुद्धा टाळला जात नाही. मन अस्वस्थ होऊन जाते. त्यात आणखी भर म्हणून मग घडलेल्या घटनेवर राजकिय नेत्यांच्या प्रतिक्रिया. प्रसिद्धी माध्यमाचा वापर स्टंटगिरी करण्यासाठी होतो. या सर्वांमध्ये सामान्य माणसाचे विचार अक्षरशः गुदमरुन जातात. तुम्हाला काय वाटते?

1. आजच्या घडीला प्रसार-प्रसिद्धी माध्यमांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवता?
2. एखाद्या गोष्टीचे वार्तांकन करणे ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे आपल्याला वाटत नाही का?
3. जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचा भारता बाहेर काय अनुभव आहे?
4. हे प्रभावी माध्यम आहे हे आपण जाणतो. आजच्या घडीला आपण त्याचा कसा वापर करु शकतो?

असे अनेक मुद्दे आहेत जे आपल्याला येथे मांडता येतील. या चर्चेच्या निमित्ताने आपण ते येथे जरूर मांडावेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्रांनी खुप महत्वाची आणि मोठी भुमिका निभावली आहे. हे प्रभावी माध्यम आहेच. ज्या काळात साक्षरता कमी होती त्यावेळचा या माध्यमाचा प्रभाव आपण वाचला आहे तर काहींनी अनुभवला आहे. आजच्या भारताला देखील या प्रभावी माध्यमाचा जबाबदारीने वापर करायचा आहे. लोकशिक्षणासाठी, देशप्रेमाचे. सेवेचे धडे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी. मित्रहो, आपण येथे लिहितो, वाचतो. महाजाल हे सुद्धा प्रभावी माध्यम आहेच. पण भारतात आज सुद्धा ते तळागाळा पर्यंत गेलेले नाही. भारतात आज सुद्धा वर्तमान पत्र जास्त प्रभावी आहे. आपण आपले विचार येथे जरुर मांडावेत. महाजालावर अनेक वृतपत्र संपादक/वार्ताहर वावरत आहेत. त्यांनी सुद्धा अशा उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर घ्या लेखणी/कळफलक आणि आपले विचार येथे मांडा. असे विचार मंथन करायचा हा पहिलाच आणि पण थोडा विस्कळीत प्रयत्न आहे. अनुभवानुसार त्यात बदल केले जातीलच. पण कुठेतरी सुरुवात व्हायला हवी. चला तर मग…



पुरोगामी कोल्हापूर आणि बेगडी धर्मांधता

गेले काही दिवस/आठवडे/महिने कोल्हापूरातला विश्वशांती यज्ञ गाजतो आहे. गाजायला तशी वेगवेगळी कारणे आहेत. कोल्हापूरचा पुरोगामीपणा दाखवण्यात तेथील राजकारणी एकदम सरसावले आहेत. नाण्याचा दोन्ही बाजूंप्रमाणे यज्ञ विरोधक आणि समर्थक आपापल्या मुद्यांसह पुढे येत आहेत. उपक्रम सारख्या संकेतस्थळांवर यावर चर्चा सुद्धा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व पातळीवर विरोध करुन सुद्धा हा यज्ञ पार पडतो आहे. असा हा यज्ञ होणे हा काही प्रमाणात लोकशाहीचा विजय मानला पाहिजे. कधी नव्हे ते हिंदू धर्मातल्या काही गोष्टींना विरोध करणे याला कोल्हापूरात पुरोगामीपणा मानले जाते त्या कोल्हापूरात विरोध होऊन सुद्धा हा यज्ञ पार पडतो आहे. अनेकांनी मुद्दे मांडले. त्यातला सर्वात चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अन्न पदार्थांची नासाडी. मी सुद्धा या कारणासाठी आक्षेप नोंदवेन. पण विरोध नाही. नासाडी न करता काही करता येत असेल तर जरुर करा.

कोल्हापूरात या गोष्टीचा कर्मकांडाचे स्तोम असा प्रचार सुरु आहे. जो आम्ही वृत्तपत्रातुन वाचतो आहे. पण स्वतःला पुरोगामी म्हणणारे हे विरोधक पुरोगामी नाहीत तर खर्‍या अर्थाने धर्मांध आहेत असे मी तरी म्हणेन.  आपल्या भारतात धर्मवेड्या लोकांचा धर्मांध म्हटले जाते. पण धार्मिक गोष्टींना, फक्त राजकिय स्वार्थासाठी विरोध करणे अथवा फक्त एका धर्माची मते मिळवण्यासाठी त्यांची भलामण करणे या सर्वस्वी आंधळ्या कृत्ये करणार्‍यांना मी धर्मांध म्हणेन. कोणत्याही धर्माच्या एखाद्या गोष्टीचा राजकिय हेतुसाठी विरोध अथवा समर्थन याला मी धर्मांधता म्हणेन.

आता जर हा विरोध नासाडीसाठी होतो आहे तर सरते शेवटी हि अन्नाची म्हणजेच पैस्याची नासाडी झाली. मग ती काही लोकांच्या समाधानासाठी आहे तरी सुद्धा. पण हे मान्य करताना, मुठभर लोकांच्या धार्मिक यात्रेसाठी कोट्यावधी रुपयांची नासाडी कशी चालते? हा कोट्यावधीचा निधी विकास कामांसाठी नक्कीच वापरता येऊ शकतो. तसेच लोकशाहीमध्ये इतर कोणत्या धर्मासाठी अशी तरतुद सुद्धा दिसत नाही. मग हे असे करणे ही सुद्धा धर्मांधता नाही का? आणि जर हे मुद्दे हिंदू नेत्यांनी काढले तर ही धर्मांधता कशी?

थोडक्यात काय? स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणर्‍या कोल्हापुरातल्या (कोल्हापूर – गाव तसं चांगल पण वेशीला टांगल!!) नेत्यांना यज्ञाची कृत्ये धर्मांध वाटतात. पण कोल्हपूरच्या विकासाचे आणि अनेक अनुत्तरीत प्रश्न मात्र बोलावेसे वाटत नाहीत. त्यांची हि कृत्ये लोकशाही धर्माविरुद्ध नाहीत का? मी तर याच लोकांना सर्वप्रकारे धर्मांध म्हणेन….



Follow

Get every new post delivered to your Inbox.