खोटारडा

खोटाच होता श्वास त्याचा, खोटीच होती स्पंदने,
खोटाच होता भाव त्याचा, ख़ोटीच होती बंधने.

अनय

अनय, हे नाव काहिंना माहित असेल तर काहिंना अजिबातच माहित नसेल. मला सुद्धा फार काही माहित नाही. मला एवढच माहित आहे कि अनय हा राधेचा पती. आता राधा कोण? असे मात्र फार कमी लोक विचारतील. पण राधा अनय बद्दल बोलतानाच “राधा कोण?” या प्रश्नाचे जे उत्तर मिळते तेच अनेक प्रश्न पुन्हा उभे करून जाते. तर, परत तो प्रश्न आलाच. राधा कोण? राधा हि कृष्णाची राधा. आता जिथे आपण अनयला राधाचा पती म्हणतो तिथेच राधा कृष्णाची म्हणतो? याला काय म्हणावे? प्रेमाची नाती? नात्यांची चेष्टा की प्रेमाची चेष्टा? नक्कि काय?
अनयचं नाव आलं की माझ्या मनात हे असे प्रश्न येतात आणि ते नेहमीच अनुत्तरीत राहतात. आजुबाजूला पाहिलं तर मला अनेक अनय दिसतात. एक काळ होता जेंव्हा प्रेमविवाह म्हणजे एक धाडस असायचं. आता आजच्या जगात प्रत्येकजण प्रेम करतो. कदाचित काहिजण अव्यक्त, काहि जण यशस्वी आणि काहिजण अयशस्वी तर काहि जण लग्ना नंतर आपल्या पती/पत्नीवर. जे पती पत्नी एकमेकांवर लग्नानंतर प्रेम करतात, प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देतात ते खरच नशीबंवान. पण जे अनय आहेत त्यांच काय? आता त्यांच्या पत्नीच पहिल प्रेम त्यांच्यावर नसेल तर त्यांचा काय दोष? कदाचित त्या राधांचं पहिल प्रेम कोणा व्यक्तिवर असेल, त्यांच्या स्वप्नावर असेल वा त्यांन्या स्वप्नांच्या गावी नेणार्‍या त्यांच्या स्वप्नातल्या जोडीदारावर असेल. खरा जोडीदार त्यांना ते कधीच देउ शकणार नाही जे त्यांना हवं होत. त्या अनयशी लग्न करतात. पण त्याला आपला प्रियकर नाही बनवू शकत. तो असतो फक्त एक पती. त्यांच्यावर प्रेम करणारा. पण आपण एक स्वीकृत पती आहोत, निवडक नाही या दुय्यम भावनेन जगणारा.
राधेच लग्न अनयशी झालं खरं. समाज मात्र म्हणताना राधा-शाम म्हणतो. आज सुद्धा अनेक राधा आपला शाम आठवत राहतात आणि अनयशी नातं जोडतात. पण या अनयला मात्र राधा आपल्यावर प्रेम करते हे समजावचं लागत कारण समाजाला या नात्यांमध्ये त्या अनयची राधा दिसत नाही की सत्यातल्या राधेचा शाम मान्य होत नाही. जे काही खर आहे ते त्या अनयला माहित आणि आजच्या अनयला माहित. आज सुद्धा अनय मात्र तोच आहे. दुय्यम, एक राधा स्वीकृत, समाज स्वीकृत, राधेचा पती…..

तळमळ

भंगले ते स्वप्न माझे, तू असा हसलास का रे?
रातराणीच्या फुलाला तू असा चुरलास का रे?

मीच होते प्रेमवेडी, तू असा भिनलास का रे?
राखरांगोळी करूनी तू असा उरलास का रे?

खेळ होता तो घडीचा, तू असा शिणलास का रे?
डाव माझा मांडुनीया तू असा उठलास का रे?

वाट थोडी पाहुनिया, तू असा विटलास का रे?
बेगडी फुलपाखरांना, तू असा भुललास का रे?

याद चाणक्या कुणाची? तू अशी पुसलास का रे?
तोडुनिया बंध सारे, तू असा झुरलास का रे?

हे ही ते ही

हे ही गेले ते ही गेले,
मजसाठी जे माझे होते,
ते सर्वकाही गेले…

भुतकाळ सुखाचा,
वर्तमान चुकीचा,
भविष्य तो कुणाचा?
ते स्वप्न सुखांचे,
ते सर्वकाही गेले…

का गुंतलो मी?
का भांडलो मी?
का भंगलो मी?
जे माझे होते म्हणुन होते,
ते सर्वकाही गेले…

हे ही गेले ते ही गेले,
स्वप्नात पाय होते,
सत्यात शुन्य होते,
ते सत्य गेले,
ते स्वप्न गेले

जे जे म्हणेन मी माझे,
ते सर्वकाही गेले…..

मंदिर

बांधले मंदिर त्यांनी, मीच त्यांचा देव नाही!!
मंदिरी या भावनांना आज काही भाव नाही!!

आरत्या ओवाळल्या जरी अन किरीट घातले!!
दैवताच्या मानसाचा माणसांना ठाव नाही!!

घेतले मम नाम किती, अन डाव तुम्ही मांडले!!
भावनांना आज माझ्या या सम असा हा घाव नाही!!

जिंकला तो धर्मराज अन तुम्हा कौतुक असे!!
आजही आत्म्यास त्याच्या, स्वर्गी त्या शिरकाव नाही!!

देवतांच्या कल्पनेचा आज कोणा ठाव नाही!!
तो म्हणे चाणक्य वेड्या भावनेला गाव नाही!!

तू नाहीस येत

एकही क्षण नाही, की तुझी आठवण नाही येत
प्रतीक्षेचा काळ लोटला, तू नाहीस येत,

श्वास घेतला मी, पण त्यात जीव नाही येत,
आठवणींचा पुर ही आटला, पण तू नाहीस येत

आठवणीच त्या, त्या काही ठरवून नाही येत,
वाईटा सोबत चांगल्याही आल्या, पण तू नाहीस येत

रोज मी चंद्र पाहतो, तो ही एक दिवस नाही येत,
रोज तो मला चिडवतो, पण तू नाहीस येत

वाट पाहू किती मी?, आता श्वास नाही मी घेत,
प्रत्येक श्वासात आठवण तुझी, पण तू नाहीस येत

अरे, चाणक्या, प्रेम असं मोजता नाही येत,
झुरलास किती ही जरी, तरी ही ती नाही येत