वाहतुक चारोळ्या

वाहतुकीची नाही येथे,
कोणालाच शिस्त,
स्वत:च्या जीवाची आहे मात्र,
दुसर्‍यावर भिस्त

वाट पहाणर,
पण पी एम टीनेच जाणार,
पी एम टीत बसुन,
स्वत:चा जीव वाचवणार

जागा मिळेल तिथुन येथे,
प्रत्येक जण गाडी हाकतो,
नसलेल्या शर्यतीत येथे,
प्रत्येक जण असाच धावतो

पाच मिनिटांच्या घाइसाठी,
उगाचच गाळतात घाम,
प्रत्येकाच्या घाइनेच
होतो येथे ट्रॆफिक जाम

हुंदका

हुंदका साधा तुझा सांगून गेला!!
माझाच श्वास मज सोडून गेला?

म्हणे तू मज आता प्रेम नाही!!
नेत्रात अश्रू का असा येऊन गेला?

बनलेत आता सगळेच वैरी!!
भाव प्रत्येक मज का दुखवून गेला?

आता कशास मी जगतोच आहे?
अर्थ जीवनातला जरी संपून गेला?

चाणक्य असते रे प्रीत खोटी!!
नीती कधीची काळ हि विसरून गेला!!

काही नाही ठीक

लेखाचे शीर्षक वाचून काहीच उलगडा नाही ना झाला? महाविद्यालयात असताना कोणती गाडी घेणार अस म्हटलं की आमचं एक उत्तर असायचं – काही नाही ठीक. अरे हे काही नाही ठीक म्हणजे काय? मग आम्ही सांगायचो, काही नाही ठीक म्हणजे कायनेटिक. :)

भारतीय वाहन बाजारावर एके काळी अधिराज्य गाजवणारा हा उद्योग समूह आणि त्यांची एक गाडी जी फक्त कंपनीच्या नावानेच आजवर ओळखली गेली/जाते, त्या गाडीची थोडी माहिती वाचण्या पूर्वी, या कंपनी बद्दल थोडे फार …

Luna TFR Luna Super भारतीय वाहन उद्योगात फिरोदिया कुटुंबीयांचे एक वेगळे स्थान आहे. आजची फोर्स मोटर्स (अभय फिरोदिया) आणि कायनेटिक मोटर कंपनी (अरुण फिरोदिया) या दोन फिरोदिया कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दुचाकी वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या उद्देशाने एच. के. फिरोदियांनी कायनेटिक वाहन उद्योगाची स्थापना केली. सर्व प्रथम १९७२ ला कायनेटिक लुनाचे उत्पादन सुरू झाले आणि मोपेड या वाहन क्षेत्रात कायनेटिकने आपले पाय घट्ट रोवले.

Kinetic Honda DX and ZX मग लुनाचे अनेक प्रकार झाले. लुना टिएफआर (एकाच व्यक्तीकरिता), लुना डबल प्लस, मॅग्नम, सुपर असेच आणि काही प्रकार झाले. खरंतर लुना हा वाहन प्रकार सायकलला पर्याय असा पुढे आला म्हणायला काही हरकत नसावी. एरवी आपोआप चालणारी अन गरज लागल्यास खरोखरच्या सायकल सारखी सुद्धा चालवण्याची सोय या वाहनात होती/आहे. या वाहनाला एकच स्पर्धक होता तो म्हणजे टिव्हीएस ५०. लुना नंतर कायनेटिक सफारी आली. पण कायनेटिक हे नाव जास्त लोकप्रिय झाले म्हणा अथवा त्यांचे जे वाहन फक्त कंपनीच्या नावानेच ओळखले गेले ती म्हणजे कायनेटिक स्कूटर होय. सायकल सदृश गाड्यांना, अवजड अन तोल सांभाळायला अवघड अश्या बजाज, एलएमएलच्या स्कूटर्सना सशक्त पर्याय म्हणजे कायनेटिकची स्कूटर. या गाडीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीने शहरातल्या  स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला.

भारतीत वाहन उद्योगात ८० चे दशक म्हणजे बजाजच्या स्कूटरचा सुकाळ होता. काही पैसे भरून, 4S वाट पाहून बजाजांची स्कूटर मिळवणे म्हणजे लोकांना प्रचंड कौतुक होते. या काळातच स्त्रिया सुद्धा आत्मविश्वासाने कार्यालयीन नोकरी करू लागल्या होत्या. पण त्यांचा रोजचा प्रवास म्हणजे स्वतःच्या “ह्यांच्या” स्कूटर वरून, बसने अथवा रिक्षाने. एखादी जास्त स्वावलंबी स्त्री असेल तर लुना. पण स्कूटर म्हणजे परिवाराची गाडी होती. बदका सारखा आकार, सामान ठेवायला थोडी जागा, मोपेड पेक्षा जास्त शक्ती, सोबत गियर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती, पत्नी, एक पुढे उभे राहणारे मूल आणि एक आईच्या मांडीवर बसणारे लहान मूल अशा चौकोनी कुटुंबाला वाहून नेण्याची क्षमता ही या स्कूटर्सची ठळक वैशिष्ट्ये होती.

याच काळात भारतीय वाहन उद्योगात जपानी कंपन्यांनी प्रवेश केला. १९८४ साली कायनेटिकने जगप्रसिद्ध होंडा कंपनी बरोबर सामंजस्य स्वीकारले आणि स्कूटरचे उत्पादन सुरू केले. वर लिहिल्या प्रमाणे बजाज- एलएमएलच्या स्कूटरची ठळक वैशिष्ट्ये होतीच. पण त्याच सोबत काही वेळा स्कूटर्सची अशी काही वैशिष्ट्ये होती की जी डोके दुखी ठरायची. त्यातली काही Nova 135 म्हणजे, डाव्या हाताला सगळे गिअर्स आणि क्लच, पाय ठेवायच्या सपाट जागेत मध्येच डोके वर काढणारा मागच्या चाकाचा ब्रेक, एका बाजूला असलेले इंजिन आणि फक्त मधले स्टँड. तसेच बंद पडल्यास चालकाच्या बसण्याच्या जागे जवळ असलेला पेट्रोलचा नियंत्रक आणि चोक यांच्या मदतीने स्कूटर सुरू न झाल्यास, रस्त्यातच स्कूटर तिरकी करणे आणि मग पाय दुखे पर्यंत किक मारणे हा एक मोठा त्रासदायक मुद्दा असायचा.  या सर्व त्रासदायक बाबी लक्षात घेऊन आणि खास करून नोकरदार स्त्रिया हा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून कायनेटिक होंडाने आपली स्कूटर बाजारात आणली.

कमी पसारा असलेली, दिसायला सुंदर, काही तरी नवे वाहन असा ठसा उमटवणारी, मुख्य म्हणजे, इंजिन मध्यभागी असल्याने तोल सांभाळायला सोपी, गिअर विरहित, त्यामुळे चालवायला सहज सोपी, बसायला एकसंध आणि मोठी सीट, पेट्रोल नियंत्रकाची - चोकची कटकट नसलेली, वाहनक्षमता स्कूटर इतकीच असलेली, एका बाजूला कलून Flyte लावण्याची व्यवस्था असलेली, स्कूटर इतकीच शक्तिशाली अन सुसाट धावणारी आणि मुख्य म्हणजे किक अथवा फक्त एक खटका दाबून सुरू होणारी अशी हि स्कूटर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. या स्कूटरने, या वाहन प्रकारात, फक्त एक खटका दाबून सुरू होणे, गिअर बॉक्स ऐवजी व्हेरीएटर (गिअर्स टाळण्या करिता), दोन्ही ब्रेक हातात, हि नवीन वैशिष्ट्ये बाजारात आणली. कायनेटिक होंडा डिएक्स आणि झेडएक्स असे दोन प्रकार उपलब्ध होते. ९८ घनसेमी क्षमतेच्या आणि टू स्ट्रोक इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये पहिला बदल झाला तो २००१ साली. इंजिनाची क्षमता ११० घनसेमी झाली. पण बाकी सगळे तेच होते. मधल्या काळात १९९८ साली होंडा कंपनीने साथ सोडली. अन स्वतःची भारतात वेगळी चूल मांडायचे मनसुबे सत्यात आणायला सुरुवात केली. मग २००५ साली कायनेटिकने बाह्य स्वरूप तेच ठेवून ११३ घनसेमी क्षमतेचे फोर स्ट्रोक इंजिन वाली हिच स्कूटर ग्राहकांसमोर आणली.  पण तोवर उशीर झाला होता. अनेक स्पर्धकांनी आपापल्या अशाच गाड्या, स्कूटरेट बाजारात आणल्या होत्या. खुद्द होंडाने ऍक्टिव्हा आणली जी ग्राहकांना आवडली.

कायनेटिकने स्पर्धा म्हणावी तेवढी योग्य प्रकार हाताळली नाही. मग ती स्कूटरेट प्रकारातली प्राइड असो,  कायनी, नोवा अथवा त्यांच्या मोटर सायकल असोत, अथवा स्टेप थ्रु,  अथवा आयात केलेल्या इतर कंपन्यांच्या गाड्या. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कायनेटिक म्हणावी तेवढी यशस्वी ठरली नाही. आज सुद्धा कायनेटिक नव्या गाड्या सादर करत आहे.

बिपाशा बसूला घेऊन केलेल्या जाहिरातीमुळे फ्लाईट नावाची स्कूटरेट थोडी फार विकली जात आहे. पण तीन गिनेज रेकॉर्ड करणार्‍या कायनेटिक होंडाच्या स्कूटरच्या यशाची उंची गाठणे अवघडच दिसते आहे.

अरुण फिरोदियांच्या कन्या, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी या कंपनीची कमान सांभाळत आहेत. पण पूर्वीचे यश अन आजची स्पर्धा पाहिल्यावर जर त्यांना कोणी विचारलं, कस काय चाललंय सगळं तर त्या नक्कीच म्हणती, फार खास असं, काही नाही ठीक…..



माझाच मी

गाव माझाच मी सोडणार आहे,
ठाव माझाच मी शोधणार आहे!!

गुंफिला प्रीतीचा गोफ तो जरी,
पाश माझेच मी तोडणार आहे!!

शत्रु नव्हतो कधी ही तुझा मी,
दंड मात्र मीच आज भोगणार आहे!!

मृत्यु नसतो प्रीतीला कदापी,
प्रेत माझेच मी जाळणार आहे!!

घाव घाला रे कुठे ही कोणी ही,
वेदना हा चाणक्य सोसणार आहे!!

वंशज

हिंदुंच्या नेत्यांना येथे
नाझीचे वंशज मानतात
कॉंग्रेसच्या शासनात मात्र
मुसोलीनीचे वंशज चालतात

ग्रह

ह्ल्ली मी भांडत नाही,
असा तिचा ग्रह आहे,
खर सांगायचच झालं तर,
माझा तिच्याशी तह आहे.

भारतीय मतदार

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते. (वेगळी असू शकते.) पण आपल्याकडे जरा खासियत असते. भारतीय मतदार जरा हटकेच आहेत हे मात्र खरे.

भारतात निवडणुक कशासाठी होते आणि कोणासाठी होते हा एक मोठा अभ्यासाचा प्रश्नच आहे. मतदान कोणत्या कारणासाठी होते कोण करते हे सगळेच एकदम अभ्यासाचे मुद्दे आहेत. निवडणुका ग्रामपंचायतीच्या असतात, साखर कारखान्यांच्या, दुधसंघांच्या…….. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या. निवडणुका होतात पण वर्षानुवर्ष त्याच त्याच मुद्यांवर होतात. मतदारांची मानसिकता फारशी बदलेली नाही. खरतर मतदान हा शब्दच कसा आहे ना? मत आपलं असत. ते आपण देणार असतो. खास करून अशा माणसाला जो समाजासाठी काही ना काही कार्य करणार असतो. आपण स्वतः सुद्धा समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यामुळे मतदान हा आपला स्वार्थ आहे. आपण मत देतो ते एका मोबदल्यासाठी. मग ते दान कसे?

आपल्याकडे १३ दिवसात सरकार पडले, परत निवडणुका झाल्या. पण सरकार पडायचे कारण काय? कांद्याचा भाव. ठिक आहे. मान्य आहे. पण त्यानंतर आजवर अनेकदा अनेक भाव अतर्क्य वाढले. पण आता सरकारे नाहीत पडत. एक बाजु मान्य करू कि हा राजकारणाचा भाग आहे. पण एकदा कांद्याच्या भावासाठी मतदान करणारा मतदार अणूकराराच्या मुद्यासाठी इतका निराश? अस का व्हावं बर? मुळातच मतदान करणारे मतदार कोण? हाच कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे कधीतरीच भरभरुन मतदान होते. जेंव्हा भारतात मतदान ८०% वगैरे होईल त्यावेळी भारतात नक्किच काहितरी जोरदार घडले असणार आहे. कारण एकदम सरळ आहे. सर्वसामान्य, प्रत्येक भारतीय मतदार सर्वात पहिले म्हणजे उजडेचमन असतो. माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे? शेवटी राजकारण हा घाणेरडा खेळ आहे, आम्हाला त्याचा भाग व्हायचे नाही. आम्ही मतदान करू, पण बोगस मतदान कोण थांबवणार वगैरे वगैरे सगळे मुद्दे मतदान न करण्यासाठी नेहमीच पुढे येतात. मग मतदान होते ते कोणाचे? ज्यांना रोजच्या रोटीचा प्रश्न आहे. ज्यांना कर भरायचाच नाही. ज्यांना कधी स्वतःचे पक्के मोठे घर बांधायचेच नाही. ज्यांना अनधिकृत गोष्टी अधिकृत करुन घ्यायच्या आहेत. हे असे मतदार मग नेटाने मतदान करतात कारण त्यांना समाजाच्या उद्याची चिंता नसते कि त्यांच्या पुढच्या काही वर्षांची.

सरकारे बनतात, पडतात, तुम्ही आम्ही त्यांच्या कायद्याच्या चौकटीत राहुन आयुष्य जगतो, रेशन कार्डावर सामान आणायला आपण जातच नाही. आतातर ते आपल्याला मिळत देखील नाही. मग त्यावर मिळणारे धान्य काय प्रतिचे आहे? हे कशाला पहायला जातोय? पण सरकार मात्र आम आदमीचा नारा देउन नवीन चित्रे रंगवुन घोटाळे करतात. कर आपण भरतो, पण खिसे कर न भरणार्यांचे भरतात. काहिजणांचे निवडणुक उभी होइ पर्यंत तर काहिंचे ऐन निवडणुकीच्या दिवसात. आपण मात्र आहोतच फॉर्म १६ भरायला तत्पर. नाहीतर सरकारचे प्रेमपत्र आहेच कधी ना कधी.

असे कित्येक मुद्दे आहेत जिथे आपण सगळेच भरडले जात असतो. मग मुद्दा कांद्याचा-डाळीच्या भावाचा असो, कि शस्त्रास्त्र खरेदिचा. आपण उदास, पण याचे जे दुरगामी परिणाम घडतात, त्याला जबाबदार कोण? आपणच आहोत. जरा डोळे उघडून बाहेर पहायला हवं. जगात अनेक देशात जागरुक मतदार आहेत. भरलेल्या कराचा मोबदला मिळालाच पाहिजे या भावनेने विचार करुन मतदान करणारे मतदार आहेत. जगात आपला देश एक जबाबदार देश आहे आणि आपल्या सरकारच्या निर्णयाचे जगावर चांगले वाईट परिणाम होणार आहेत याचा विचार करुन मतदान करणारे मतदार आहेत. मग भारतीय मतदार असे का? एवढे उदास, एवढे कमविचारी? कि आम्ही असेच आहोत? आम्हाला सगळंच जे घडत ते मान्य आहे? आम्हाला आमचं आमचं राज्य करायची इच्छा नाही? कि आमच्यावर लादलेलेच राज्य जास्त चांगल असत? छातीठोक पणे सांगायच कि भारतातली लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही आहे. मात्र हे सांगताना मतदान करणारे मतदार खरच प्रगल्भ आहेत? भारतात मतदारांनी खरच आपला हक्क म्हणून मतदान केले, जगाची एक महासत्ता म्हणून मतदान केले, आपल्या समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी मतदान केले तर? असे होइल का? भारतीय मतदार खरच सुजाण, अभ्यासू आणि जबाबदार मतदार बनेल काय?

मी असा कसा ?

रोजचा दिवस ढकलतो मी असा कसा?
रोजचा कड्यावरून मला ढकलतो मी असा कसा ?

नित्य नवे स्व्प्न जरी मी पाहतो,
रोज ध्येय माझेच बदलतो मी असा कसा ?

प्रेम खरे जरी मी शोधतो,
रोज प्रेयसी माझीच विसरतो मी असा कसा ?

पदरी आहे जरी निराशा,
रोज आशा माझीच खुलवतो मी असा कसा ?

वाहतात श्रद्धांजली (मला) का?
रोज प्रेत माझेच जाळतो मी असा कसा?

चाणक्य आहे जनता ही भोळी
रोज निती माझीच शिकवतो मी असा कसा?

जमलेच नाही

प्रेम होते करायचे मज जमलेच नाही
काम होते भावनांचे मज जमलेच नाही

प्रितीचा असा अव्यक्त खेळ खेळला
व्यक्त तुजला कराया जमलेच नाही

लिहिल्या किती जरी मी कविता,
जीवनाचे सुर आपुल्या जुळलेच नाही ..

होता नकार कधीचाच ओळखला,
नकाराचे दाम मजला कळलेच नाही

तो असा हवा अन तो हवा तसा ही
समजणे चाणक्य कोणा जमलेच नाही..

कधीचच सोडलंय

आताशा मी चिडणं कधीचच सोडलंय
आताशा मी रडणं कधीचच सोडलंय
आयुष्यात कोणाचं कोणा वाचून कुठे काय अडलंय?
म्हणूनच मी आता माझं मला वाऱ्यावर सोडलंय…